नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानमध्ये गुर्जर आंदोलनाने पेट घेतला आहे. त्यामुळे नवनियुक्त कॉग्रेस सरकारच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, राजस्थानमधल्या गुर्जर समाजानं छेडलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. आक्रमक आंदोलकांनी धोलपूरमध्ये तुफान दगडफेक आणि गोळीबार केल्याचे वृत्त आहे. तसेच ३ गाड्यांची देखील जमावाकडून जाळपोळ करण्यात आली आहे.
धोलपूरच्या दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गाला जाम केल्यानंतर आंदोलक आणि स्थानिक पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर जमावानं प्रतिऊत्तरादाखल पोलिसांवर देखील तुफान दगडफेक केली. त्यावेळी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी देखील हवेत गोळीबार केला. मात्र त्यानंतर अधिकच गोंधळ उडाला. संतप्त जमावानं ३ गाड्यांची जाळपोळ केली असून, दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वातावरण तणावपूर्ण असल्याचे समजते.
आंदोलकांनी दुपारी धोलपूर शहरात आरक्षणासाठी एक बैठक आयोजित केली होती. त्यानंतरच आंदोलकांनी आक्रमक होत दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला. त्याचदरम्यान पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. संतप्त जमावानं सुद्धा पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली.
Rajasthan: A clash broke out between police and protesters at Dholpur Highway today where the latter had blocked the road and set vehicles ablaze. The protesters were supporting the ongoing reservation movement by Gujjar community. pic.twitter.com/bq8U2JBCpe
— ANI (@ANI) February 10, 2019
