मुंबई : आरबीआय’च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. मोदी सरकारला कोणत्याही विषयात सत्य समोर ठेवणारे लोक नको असून केवळ हो ला हो बोलणारे होयबा हवेत अशी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नेमणूक त्याच उद्देशाने झाली असेल तर ही येऊ घातलेल्या आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून आज व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याचे सामनातून म्हटलं आहे.
याआधी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी सुद्धा याच विषयाला अनुसरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते आणि त्यात आता शिवसेनेने भर टाकली आहे. विशेष म्हणजे खासदार व डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आणि हे सर्व आरोप कागदावरील आहेत. परंतु, असं सर्व असताना सुद्धा दास यांना देशाच्या सर्वोच्च आर्थिक संस्थेच्या खुर्चीवर विराजमान करण्यात आले आहे आणि हे भविष्यासाठी धक्कादायक आहे असं म्हटलं आहे.
शक्तिकांत दास यांची अतिमहत्वाच्या पदी नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’ आणि थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको, दास देशभरातील राजकारण्यांशी चांगले हित संबंध ठेवून आहेत. परंतु इथे विषय महागाई आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा आहे. सत्ताधाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी निर्माण केलेली ही भुताटकी आरबीआयचे गव्हर्नर कशी आटोक्यात आणणार ?, असा थेट प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या नियुक्तीवरून भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर चोहो बाजूने टीका होताना दिसत आहे.
