चिपी : आज कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान उतरविण्यासाठी लागणा-या ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने मिळाले असताना घाईघाईने एचडीएल कंपनीचे खासगी विमान उतरविण्याचा अतिउत्साहीपणा अंगलट येण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे गणेश चतुर्थीच्या तोंडावर गणरायाचं प्राणप्रतिष्ठा करण्याचं ठरवलं, परंतु त्याच गणरायाला लगेज’मध्ये बॉक्समधून भरून आणण्यात आलं. सार्वजानिक असो वा घरगुती ‘बाप्पाची’ प्रतिष्ठापना करतांना त्याला ‘सीलबंद’ करून आणण्यात येत नाही.

एचडीएल कंपनीचे खासगी विमान भाड्याने घेऊन चिपी विमानतळावर विमान उतरविण्याची नौटंकी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी केली. ६२ परवान्यांपैकी केवळ २५ टक्केच परवाने प्राप्त झाले असल्याने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच हवाई वाहतूक मंत्रालयाचे संबंधित महत्वाचे अधिकारीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते असं वृत्त आहे. स्वत:चा हट्ट पुरविण्यासाठीच खासगी विमानातून गणपती बाप्पाला आणण्यात आला. त्यातही गणरायाची ही मूर्ती चक्क विमानात जिथे लगेज ठेवतात, त्या भागातून भरून आणण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर तसेच शिवसेनेचे मंत्री यांनी केलेल्या या उठाठेवीबद्दल माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

वास्तविक नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री असताना चिपी विमानतळाच्या विषयाने जोर धरला होता आणि त्या अनुषंगाने प्रशाकीय प्रयत्न करून त्यात सातत्य ठेवले होते. त्यामुळेच आज चिपी विमानतळाचे स्वप्न साकार झाल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. परंतु २०१४ नंतरच्या निवडणुकीत आयत्यावेळी बेडूकउडी घेऊन राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले दीपक केसरकर आमदार म्हणून निवडून आले आणि नारायण राणेंवर केवळ राजकीय कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेतील जुन्या आमदारांना डावलून केसरकरांनी मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद देण्यात आलं. त्यात विनायक राऊत सुद्धा खासदार म्हणून निवडून आले.

कोकणातील आणि विशेषकरून रत्नागिरीतील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे शिवसेनेवर निसर्गप्रेमी कोकणी समाज संतापला आहे. त्यात गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सर्व कोकणचे चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात जातात, त्यामुळे घाईघाईमध्ये चिपी विमानतळाच्या उदघाटनाचा घाट घालून कोकणवासीयांना खुश करण्याचा केवीलवना प्रयत्न शिवसेना नेत्यांच्या अतिउत्साहीपणामुळे अंगलट येण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच ठाण्यातसुद्धा विरोधकांचा एखादा विषय किंवा विकासाचं कामं हायजॅक करायचे प्रकार शिवसेनेकडून वरचेवर सुरूच असतात.

‘तयारी सगळी गाववाल्यानी करायची आणि आरतेक आयतो येवन मुंबयकारान उभो रवाचा तो सुद्धा अनधिकृतपणे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा चिपीचा विमान लॅडिंग!!’ अशा कोकणी भाषेत ट्विट करुन आमदार नितेश राणे यांनी केसरकर यांची खिल्ली उडवली आहे. तसेच ‘गणरायाची मूर्ती विमानाच्या लगेजच्या भागामधून आणुन अपमान करणा-या दीपक केसरकरांचा निषेधही नितेश राणे यांनी केला आहे. चमकूगिरीच्या नादात गणरायाचा हा अपमान कधीच सहन नाही करणार!!!,’ असे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

१२ सप्टेंबरला विमानसेवा सुरू होईल अशी बोंबाबोंब करणारे खासदार विनायक राऊत आणि मंत्री दीपक केसरकर तोंडघशी पडू नयेत म्हणून प्रवाशांशिवाय विमान आणि गणपती बाप्पा बॉक्समध्ये सीलबंद करून लगेजने उतरविण्याचा देखावा केसरकर यांना करावा लागला आहे. त्यामुळे कोकणी माणूस शिवसेना नेत्यांच्या या अतिउत्साहामुळे संताप व्यक्त करण्याची शक्यता आहे असं स्थानिक राजकीय विश्लेषक मत व्यक्त करत आहेत.

Shivsena leader carried ganesh statue from seal box and luggage compartment