औरंगाबाद : शिवसेनेचे कन्नड मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढण्याच्या विषयावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, शिवसेनेने जी काही धोरणे घेतली आहेत, ती मला अजिबात पटलेली नाहीत. त्यात मराठा आरक्षणावर काहीही बोलायचे नाही, अशी सक्त सूचना मला देण्यात आली होती. परंतु त्यांची ती सूचना मला पटली नाही. त्यात शिवसेनेची इतर काही धोरणे सुद्धा मला पटलेली नाहीत. तेव्हाच मी त्यांच्याबरोबर आता अजिबात थांबायचे नाही, असे ठरविले होते.
दरम्यान, नवीन पक्ष स्थापनेबद्दल बोलताना आमदार जाधव म्हणाले की, मी माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा या आधीच विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे शिवसेनेशी आता माझा कोणताही संबंध राहिलेला नाही, असं स्पष्ट करत शिवसेनेला अधिकृत जय महाराष्ट्र केला आहे. सामाजिक विषमता मिटविण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा काय, यावर चिंतन करण्यासाठी मी तापडिया नाट्य मंदिरात चिंतन बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत १८ पगड जातींच्या प्रतिनिधींनी हजेरी लावत त्यांची मते मांडली होती. त्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची अधिकृत घोषणा करून महिनाभरात पक्ष नोंदणी होईल, त्यानंतर २ ते ४ दिवसांत पक्षाचे नाव जाहीर करणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केलं.
समाजातील न्हावी, माळी, कोळी, धनगर, दलित, राजपूत, ठाकूर, वंजारी, मुस्लिम अशा प्रत्येक घटकाला त्रास होत आहे. प्रथम मी मराठा समाजाचा पक्ष काढण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यानंतर मला समजले की, मराठा समाज तसेच इतर समाजांचे देखील सामान प्रश्न आहेत. त्यामुळेच मी सर्वांना सोबत घेऊन पक्ष काढण्याचे ठरविले.
