मुंबई : स्वर्गीय. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वासंबंधित किंवा त्यांच्या विचारांशी संबंधित ‘ठाकरे’ का काही पहिला सिनेमा नाही. याआधी ‘बाळकडू’ हा मराठी सिनेमा देखाली प्रदर्शित झाला होता. त्यामधल्या कथेत थेट स्वर्गीय. बाळासाहेबांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या सुरुवातीपासूनच्या राजकीय प्रवासाचा काहीच समावेश नसला तरी त्यांच्या विचारांचा समावेश यामध्ये करण्यात आला होता. त्यात मुख्य भूमिकेत असलेल्या उमेश कामत यांच्यासोबत थेट बाळासाहेब बोलतात असे दाखविण्यात आले होते. परंतु, २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची संकल्पना ही २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाशी साम्य असणारी होती. दरम्यान, याच ‘बाळकडू’ सिनेमाने त्यावेळी काही विशेष कामगिरी केली नव्हती.
त्यामुळे स्वर्गीय. बाळासाहेबांवर एखादा जीवनपट बनवायचा म्हणजे सोपे काम नव्हते. अगदी बॉलिवूड’मधील एखाद्या दिग्दर्शकाला याची जवाबदारी देण्यात आली असती तरी ते अशक्य होतं. कारण त्या व्यक्तीमत्वाला जवळून पाहिलेल्या आणि त्यांच्याच गौताळ्यात वावरलेल्या व्यक्तीकडे ती जवाबदारी देणे हाच शहाणपणा होता. त्यात शिवसेनेची स्वतःची चित्रपट सेना असली तरी त्यांचाकडे तशी जवाबदारी पेलू शकेल अशी अनुभवी व्यक्तीच नव्हती. त्यामुळे ‘रेगे’ सिनेमातून छाप पडणारे मनसे नेते अभिजित पानसे हेच संजय राऊतांच्या नजरेस का पडले असावेत याचं उत्तर मिळेल.
चित्रपट रसिकवर्ग नेहमी त्याचा पैसा वसूल करण्यासाठीच चित्रपट गृहात प्रवेश करतो. मग तुम्ही त्याचा पैसा वसूल करण्यासाठी ते कॉमेडी, ऍक्शन वगरे वगरे अशा कोणत्याही मार्गाने करा, पण त्याचा पैसा वसूल होणे गरजेचे असते. त्यात जर चित्रपट राजकारणासंबंधित असेल तर आवाहन फारच कठीण असतं. त्यामुळे स्वर्गीय. बाळासाहेबांवर आधारित चित्रपटातील सर्वात मोठं आवाहन म्हणजे त्याचं सादरीकरण हाच हुकमी एक्का होता, जो प्रेक्षकांना खिळवून ठेऊ शकतो. केवळ प्रमो प्रदर्शित झाला आणि बाळासाहेबांना दिलेल्या आवाजाने प्रेक्षक नाराज झाले. यावरूनच प्रेक्षक किती बारकाईने सगळं पाहतो, त्याचा प्रत्यय येतो.
त्यामुळे संपूर्ण ‘ठाकरे’ सिनेमाचं प्रेक्षकांना भावणारं दर्जेदार सादरीकरण दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्याकडून करून घेण्यात आलं. कारण तेच प्रेक्षकाला खिळवून ठेवणारं एकमेव अस्त्र होतं. कारण, जी कथा सिनेमामध्ये मांडण्यात आली आहे, ती जवळपास सर्वांना माहित आहे. परंतु, काही दिवसांपासूनचं एकूण सर्वच थरातील प्रोमोशन आणि मार्केटिंग पाहिल्यास संजय राऊतच निर्माते आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रकट होतं होते. समाज माध्यमांवर अनेकांनी अशा प्रोमोशनबद्दल शंका व्यक्त केली होती. त्यामुळे जसजशी प्रदर्शनाची तारीख जवळ येऊ लागली तस तसा निर्मात्यांमधला राजकारणी दिसू लागला होता. इथेच निर्मात्यांनी सर्वात पहिला प्रेक्षक वर्ग गमावला आहे आणि तो म्हणजे लाखो महाराष्ट्र सैनिक. त्यातील दुसरा प्रेक्षकवर्ग जर उद्या ‘मणिकर्णिका’कडे वर्ग झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
त्यामुळे हाडाचे राजकारणी असलेले आणि सध्या चित्रपट निर्माते झालेल्या संजय राऊतांसोबत भविष्यात कोणी काम करण्यास सहज तयार होईल, असे या अनुभवावरून तरी प्रथम दर्शनी वाटत नाही. कारण कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये तोच मनुष्य पुढे जातो, जो क्रेडिट घेतो आणि तेवढेच क्रेडिट दुसऱ्याला देतो सुद्धा. कारण राजकारणातील स्वतःच्या खुर्च्या राखीव ठेणाऱ्या संजय राऊतांना ‘ठाकरे’ सिनेमाच्या दिग्दर्शकासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बसायला साध्या २-३ खुर्च्या सुद्धा राखीव ठेवता आल्या नाहीत, हा सुद्धा त्यांच्या मिस-मॅनेजमेंटचा प्रकार आहे.
