मुंबई : मुंबईतील खड्यांची समस्या ही नेहमीचीच झाली असताना त्या संबंधित प्रश्न युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना प्रसार माध्यमांनी विचारला असता, ‘जर मुंबई शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेला जबाबदार धरता, तर पालिकेला तसे अधिकार सुद्धा द्या’, असं मत व्यक्त केलं. तसेच आम्ही चांगले दर्जेदार रस्ते येण्याचा प्रयत्नं करत आहोत. मागच्या वेळी जिथे खराब रस्ते होते, तिथे चांगले रस्ते झालेले आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मुंबईतल्या रस्त्यांच्या कामाचे अधिकार महापालिकेकडे किंवा एखाद्या संयुक्त संस्थेकडे असले पाहिजेत अशी इच्छा सुद्धा व्यक्त केली. मुंबई शहरातील व उपनगरांतून जाणाऱ्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचाच जर विचार करायचा झाल्यास या मार्गांच्या देखभालीसाठी ४ निरनिराळ्या यंत्रणा असल्याने त्यांच्यात ताळमेळ राहणे खूप कठीण आहे असं त्यांनी सांगितले.
शहरातील विकासकामांसाठी रस्ते खणताना महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक करायला हवे आणि एका दिवसांत सर्व खड्डे बुजवले जातील असे मी कधीही म्हणालो नव्हतो असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
