मुंबई : देशात सर्वत्र भ्रष्टाचार आहे, परंतु आपले संरक्षण खाते सर्वाधिक भ्रष्ट आहे. राफेल लढाऊ विमानखरेदीतील संशयास्पद करारावरून ही बाब मोठ्या प्रमाणावर अधोरेखित होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’च्या परिसंवादात व्यक्त केले.

मरिन लाईन्स येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रविवारी झालेल्या परिसंवादाची सुरुवात ‘राफेल: मोदीज नेमेसिस?’ या विषयाने झाली. या विषयावर राफेल प्रकरणाबाबतची स्फोटक माहिती राम यांनी दिली. ‘सरकारने युरो फायटरसारखे चांगले पर्याय असताना राफेलची निवड करण्यात आली. ‘दसॉल्त’शी करार करताना पंतप्रधान कार्यालयाकडून समांतर वाटाघाटी केल्या गेल्या. इतकेच नव्हे तर या करारातील भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आल्या. रशिया तसेच अमेरिका यांच्याशी केलेल्या करारांमध्ये अशा तरतुदी नाहीत हे खरे असले तरी ते त्या देशांच्या सरकारांशी केलेले करार असल्याने त्यात तशी गरज नव्हती. परंतु राफेलमध्ये सरकारचा व्यवहार एका खासगी कंपनीशी होत होता. अशा वेळी या तरतुदी काढण्याचे प्रयोजन काय? या आणि अशा अनेक संशयास्पद बाबींमुळे राफेल खरेदी प्रकरणाला भ्रष्टाचाराची दरुगधी येते, असे राम म्हणाले.

प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी ‘लेट्स टॉक अबाऊट सेक्युलॅरिझस’ या विषयावर बोलताना धर्मनिरपेक्षतेची आपली व्याख्याच चुकली आहे, असे विधान केले, तर ‘हिंदूइझिंग इंडियन डेमॉक्रसी’ या विषयावर मत मांडताना विचारवंत कंवल भारती म्हणाले की, धर्मामध्ये असमानता असते आणि संविधानासमोर आपण सर्व एकसमान आहोत. ‘स्त्री-पुरुषांना समान न्याय’ या विषयावर बोलताना, स्त्रियांना समान न्याय मिळवून देताना धर्माचा सर्वात मोठा अडथळा असल्याचे मत मरीअम ढवळे यांनी मांडले.

The Hindu n ram comment on ministry of defence