नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय असले तरी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०११ साली गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रण्ट गुजरात समिट वेळी त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे सॅम पित्रोदा हे भारतातील मोबाईल क्रांतीचे जनक म्हणून परिचित आहेत आणि राजीव गांधी पंतप्रधान असताना टेलिकॉम क्रांती झाली त्यात त्यांची मोलाची भूमिका होती.

एका मुलाखतीत त्यांनी भारताच्या हवाई हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला असून पित्रोदा यांच्या या विधानांमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. पुलवामा येथील हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर केलेले एअर स्टाइक या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पित्रोदा म्हणाले, भारताच्या या हवाई हल्ल्याबाबत मी न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर वर्तमानपत्रांमध्ये वाचले. त्यानुसार, भारताने खरंच असा हल्ला केला का? आपण खरंच ३०० दहशतवादी मारले? जर तुम्ही म्हणता की ३०० दहशतवादी मारले, तर सर्व भारतीयांना याचा पुरावा मिळायला हवा. कारण, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही असं आंतरराष्ट्रीय माध्यमे म्हणत आहेत. त्यामुळे भारतीय नागरिक म्हणून मला याचे वाईट वाटते, असे त्यांनी सांगितले.

Was there really an air strike at balakot question from sam pitroda during interview