नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला महाराष्ट्राबरोबर गुजरातमधून सुद्धा विरोध वाढू लागला आहे. त्यात बुलेट ट्रेन म्हणजे श्रीमंतांचे चोचले असल्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे विरोध दिवसेंदिवस अजूनच गडद होत जाणार हे काँग्रेसला उमगल्याने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अशी घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू असं वचन पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला विरोध दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये हा महत्वाचा मुद्दा बनू शकतो याची चुणूक काँग्रेसला लागली आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्रित पणे या प्रकल्पाची उभारणी करणार आहे. त्यासाठी नागपूरमधील पावसाळी अधिवेशनात २५० कोटीची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला असता, विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
बुलेट ट्रेनचा प्रकल्प राज्याच्या फायद्याचा नसून केवळ राज्यावर आर्थिक बोजा टाकणारा आहे असं विरोधकांचं मत आहे. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने असे निर्णय आर्थिकदृष्ट्या परवडणारे सुद्धा नाहीत असं काँग्रेसला वाटत. त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आल्यास हा प्रकल्प रद्द केला जाईल अशी घोषणा केली आहे. या प्रकल्पाचा खर्च ६५ हजार कोटी असून, जपानबरोबर झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे तो १ लाख १० हजार कोटींचा आहे. या बुलेट ट्रेनने केवळ एका प्रवाशाला मुंबईहून अहमदाबाद प्रवास करायचा असल्यास १३ हजार रुपये इतका खर्च येईल. त्यामुळे हा प्रकल्प सामान्यांच्या अजिबात फायद्याचा नसल्याचे समोर आलं आहे.
