चेन्नई : बाराव्या आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेचा हंगाम आजपासून सुरू होत असून, सलामीच्या लढतीत महेंद्रसिंग धोनीचा गतविजेता चेन्नई संघ आणि विराट कोहलीचा बंगळुरू संघ यांच्यात मुकाबला होणार आहे. तीनवेळा ही स्पर्धा जिंकणारा चेन्नई संघ जेतेपदाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाला आहे.
तर तीनवेळा या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा विराटचा बंगळुरू संघ यंदाच्या मौसमात जेतेपदावर कब्जा करण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. पण कागदावर तरी चेन्नई संघाचेच पारडे जड असून, विजयाने यंदाचा मौसम सुरू करण्यास आपल्याला आवडेल, अशी प्रतिक्रिया चेन्नई कर्णधार धोनीने सामन्यापूर्वी दिली आहे. या स्पर्धेतील सर्वात वयस्कर संघ म्हणून चेन्नई संघ ओळखला जातो. कर्णधार धोनी ३७ वर्षांचा असून, सलामीवीर वॉटसन ३५ वर्षांचा आहे. अष्टपैलू ब्रावो ३४, डुप्लीसीस ३३ आणि रायडू, जाधव, रैना हे सर्व ३२ वर्षांचे आहेत. फिरकी गोलंदाज ताहीर ३९ तर हरभजन ३८ वर्षांचे आहेत. कर्ण शर्मा आणि मोहित शर्मा हेदेखील अनुक्रमे ३१ वर्षांचे आहेत. बुजुर्ग खेळाडू चेन्नई संघात असले तरी या संघाचे सातत्यपूर्ण कामगिरी या स्पर्धेत वाखाणण्यासारखी आहे. गेल्या ११ स्पर्धेत चेन्नई संघाने प्रत्येक वेळी स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यश मिळविले.
अपवाद २ वर्षांचा जेव्हा त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. चेन्नईसारखा पराक्रम इतर कुठल्याच संघाला करता आला नाही. चेन्नईचे अंबाती रायडू आणि रविंद्र जडेजा चांगली कामगिरी करून आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. तीच गोष्ट बंगळुरू संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवलादेखील लागू पडेल. उभय संघात झालेल्या लढतीत तब्बल १५ लढती चेन्नई संघाने जिंकल्या आहेत. तर अवघ्या ७ लढती चेन्नईने गमवल्या. एका लढतीचा निकाल लागला नाही. २०१४ पासून चेन्नई संघ बंगळुरू विरुद्ध अद्याप एकही सामना हरला नाही.
आपल्या घरच्या मैदानावर खेळणार्या चेन्नई संघाची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. फिरकी गोलंदाज चहलच्या कामगिरीकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष्य असेल. तर बंगळुरूची फलंदाजीची मोठी मदार कर्णधार विराट कोहली, ए. बी. डिव्हिलिअर्स, पार्थीव पटेल, स्टोनिस, दुबे आणि हेटमेअर यांच्यावर असणार आहे. तर गोलंदाजीत साऊदी, यादव, सायनी, सिराज, सुंदर यांना बंगळुरूची धुरा वाहायची आहे. चेन्नई संघाची भक्कम फलंदाजी कर्णधार धोनी, रैना, वॅटसन, रायडू, डुप्लीसीस आणि मुरली विजय यांच्या खांद्यावर असेल. तर गोलंदाजीचा भार शार्दूल ठाकूर, जडेजा, जाधव, ताहीर, सॅन्टर, मोहीत शर्मा यांच्यावर असणार आहे. आयपीएलमधील दोन बड्या संघातील सलामीचा मुकाबला चुरशीचा होईल, अशी अपेक्षा दोन्ही संघाचे चाहते करत असतील.
