नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया या संघांमधील मालिकेचा अखेरचा आणि निर्णायक सामना आज बुधवारी राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला क्रिकेट मैदानात रंगणार असून आजचा सामना जिंकणारा संघ ही एकदिवसीय मालिका आपल्या नावावर करणार असल्याने दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. त्यामुळे नवी दिल्लीतील फिरोज शाह कोटला येथे होणार्या पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताविरुद्ध चालू असलेल्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना जिंकून जबरदस्त पुनरागमन केले. यासह कांगारूंनी मालिकेत २-२ अशी बरोबरीही साधली आहे आणि सलग तीन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उत्साही आहेत. उस्मान ख्वाजा, अॅरॉन फिंच, पीटर हँडस्काँब आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. तर पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांच्यावर भारतीय फलंदाजांना रोखण्यात आव्हान असणार आहे.
