बंगळुरू: चंद्रापासून अवघे २.१ किमीच्या अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि भारताच्या चांद्रयान- २ मोहिमेला धक्का बसला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होत सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला. यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत आहेत होते.

चांद्रयान २ च्या संपूर्ण अभियानादरम्यान देश अनेकदा आनंदीत झाला आहे. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता असे मोदी म्हणाले. इस्त्रोच्या सेंटरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.

इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे. अडचणींमुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही. लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही. आम्हाला तुमचा गर्व आहे, देश तुमच्यासोबत आहे असं नरेन्द्र मोदींनी म्हटलं आहे. चांद्रयान २ मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार असल्याचं त्यांनी सांगितलं.

चांद्रयान-२ मोहीम: इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा; पुन्हा जोरदार प्रयत्न करावे