कोल्हापूर : आज मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत बैठकआयोजित केली आहे. परंतु श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह अनेक नेतेमंडळी तसेच मराठा समाजातील विचारवंतांनी अक्षरशः पाठ फिरविली आहे असं वृत्त आहे.
मराठा समाजातील या मोठ्या मंडळींनी आणि विचारवंतांनी बैठकीकडे कानाडोळा केल्याने मुख्यमंत्री आणि राज्यसरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. त्यात शाहू छत्रपती यांनी तर मुख्यमंत्र्यांना थेट ठणकावले की चर्चा कसली करता, निर्णय घ्या आणि त्यामुळे अजूनच अडचण झाली आहे.
दुसरीकडे सकल मराठा समाजाने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याला अनुसरून मराठा समाजातील मान्यवरांशी चर्चा करण्यास मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात आज बैठक बोलावली आहे. सरकारने त्यासाठी शाहू छत्रपती, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे यांना निमंत्रित केले होते. परंतु शाहू छत्रपतींनी फडणवीसांकडे नव्हे, तर फडणवीसांनी शाहू छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भूमिका सकल मराठा समाजाने व्यक्त केल्याने त्यांनी बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला.
