मुंबई : देशभर सुरु असलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे सुशिक्षित महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण घटेल, असं मत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी वक्त करत ‘मी टू’ मोहीमेमुळे महिलांचं अप्रत्यक्ष रित्या नुकसान होणार आहे असं सूचित केलं आहे. एखादी महिला ५-१० वर्षानंतर तक्रार करेल या भीतीनेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण घटेल असं शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना वाटतं आहे.

दरम्यान, राज्याच्या ग्रामीण भागात सुद्धा महिलांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते. परंतु त्यांना ‘मी टू’ सारख्या मोहिमांबद्दल काहीच कल्पना नसते आणि त्यामुळे अशा मोहीमांमुळे महिला सक्षमीकरण होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मंगळवारी राज्य महिला आयोग आणि समाजसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला शिवसेना आमदार संजय शिरसाट सुद्धा सहभागी झाले होते. दरम्यान, ‘मी टू’ मोहीमेबाबत उपस्थितांसमोर संवाद साधताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘मी टू’ चा अर्थच मला समजलेला नसून मला सुद्धा ‘मी टू’ची भीती वाटते. स्वतः ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या महिलांसाठी ते एक हत्यार ठरु लागले आहे असं रोखठोक मत त्यांनी उपस्थितांसमोर त्यांनी मांडलं. कुटुंबात लहान मुलांना सांभाळणे, त्यांना चांगले संस्कार देणे आणि संपूर्ण संसाराचा गाडा सुरळीत ठेवणे ही महिलांची प्रमुख जबाबदारी आहे. पण सध्या कोणती महिला काय आरोप करु शकेल याचा अंदाज मांडणं कठीण आहे. नवी साडी दिली नाही म्हणून विवाहित महिला पतीविरोधात सुद्धा ‘मी टू’ म्हणणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच विमा योजनेत पुरुषांना विमा दिला जातो. यात कमावत्या पुरुषाला काही झाल्यास घरातील महिलेला भरपाई मिळते. पण पत्नीचे निधन झाल्यावर पुरुषांना काय मिळते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधिंनी त्यांना त्यांच्या रोखठोक भाषणातूनच चोख उत्तर दिले.

shivsena mla sanjay shirsat speech on metoo campaign at aurangabad