नवी दिल्ली : चीनच्या पाणीदार खेळीमुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशासमोर सध्या पाणी-बाणी सदृश्य संकट उभं आहे. दरम्यान, आसाम राज्यातील एकूण १० गावं पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. सर्व सरकारी यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. चीनच्या अखत्यारीतील तिबेटमध्ये भूस्खलन झाल्यानं एका नदीचा मार्गच बंद झाला आहे. त्यामुळे या अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव तयार झाले आहेत.
तिबेटमध्ये भूस्खलन झाल्याने यारलुंग सांग्पो नदीचा मार्ग बंद झाला. दरम्यान बांध फुटल्यास सध्या साचलेलं पाणी अतिशय वेगात वाहू लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सखल ठिकाणी असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या अनेक भागाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तीच नाही भारतात सियांग नावानं ओळखली जाते तर आसाममध्ये तीच नदी ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. दरम्यान नदीचं पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याची अधिकृत माहिती चीननं भारताला दिली आहे. त्या माहितीनुसार या पाण्याचा वेग प्रति सेकंद १८,००० क्यूबिक मीटर इतका असेल. परिणामी ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावरील भाग पाण्याखाली गेला आहे. तसेच आसामच्या धेमाजी, डिब्रूगढ, लखीमपूर, तिनसुकिया आणि जोरहाट जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
तिबेटमधील भूस्खलन नैसर्गिक कारण पुढे करून चीन भारताचं पाणीबाणी अंमलात आणू शकतो, असा संशय भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. चीनकडून अनेकवेळा धोक्याचा इशारा उशीरा दिला जातो आहे असं वृत्त आहे. त्यामुळे सरकारला नुकसान टाळता येणं अवघड होतं आहे. मागील वर्षी सुद्धा काझीरंगामध्ये प्रचंड पूर आला होता आणि त्यात अनेक प्राण्यांनी जीव गमावल्याने सामान्य जनताच पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सुद्धा चीननं भारताला उशीरा धोक्याची घंटा दिली होती असा अनुभव आहे.
