बीड : सध्या ग्रामीण महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यात सरकारने सध्या केवळ ‘दुष्काळ सदृश्य’ परिस्थिती असा उल्लेख केल्याने विरोधकांनी रोष व्यक्त केला असताना फडणवीस सरकारचा शेताचे दाखले आणि पीकाचा दिखाऊ सर्वे समोर येत आहे. कारण, सध्या महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळी ग्रामीण भागाची पाहणी सुरु आहे. परंतु, धक्कादायक म्हणजे राज्य मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बीडमध्ये रात्रीच्या वेळेला चक्क बॅटरीच्या प्रकाशात पीक पाहणी केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. पुढे असेच दिखाऊ प्रकार आणि सर्वे अनेक भागात होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काल म्हणजे शनिवारी रात्री उशिरा दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नित्रुड या गावात राज्यमंत्री संभाजी पाटील निलंगेकर गेले होते. दरम्यान, त्यावेळी गावाशेजारी विजेची सुविधा नसल्याने त्यांनी चक्क लहान बॅटरीच्या प्रकाशात शेताचे दाखले आणि पीकाचा सर्वे केला. दुसरं धक्कादायक म्हणजे हा संपूर्ण गावाचा सर्वे त्यांनी केवळ २० मिनिटांत पूर्ण केला, त्यामुळे फडणवीस सरकार सर्वेच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची केवळ चेष्टा करत आहे का, अशी शंका शेतकरी उपस्थित करत आहेत.
दरम्यान, रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या प्रकाशात सर्वे केल्याने सरकार या विषयावर किती गंभीर आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे. दिवसा ढवळ्या सर्वे करून शेतकऱ्यांना नीट भरपाई मिळत नसताना आता रात्रीच्या अंधारात सरकारला काय नुकसान दिसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सरकारच्या या दिखाऊ सर्व्हमुळे दुष्काळात होरपळणारा शेतकरी अजूनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विषयावर विरोधक काय भूमिका घेणार ते पाहावं लागणार आहे.
