नवी दिल्ली : बीबीसी न्यूजने केलेल्या एका संशोधनानुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय नागरिक ‘राष्ट्र उभारणी’च्या उद्देशाने राष्ट्रवादासंदर्भातील बातम्या मोठ्या प्रमाणावर शेअर करतात. राष्ट्रवादासंदर्भातील संदेश पसरवणे त्यांना स्वतःचे कर्तव्य वाटते असं म्हटलं आहे. दरम्यान, भारत देशाची प्रगती, हिंदुशक्ती तसेच हिंदू गतवैभवाला झळाळी अशा विषयां बद्दलची खोटी माहिती कोणतीही खात्री न करता मोठ्या प्रमाणावर पुढे पाठवली जाते असं समोर येत आहे.

दरम्यान, अशा प्रकारचे संदेश पाठवून आपण आपल्या राष्ट्र उभारणीच्या कार्यात मोठे योगदान देत आहोत, अशी भावना सामान्यांच्या मनात असते,’ असे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने अर्थात “बीबीसी” केलेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहे. तसेच भारतात “फेक न्यूज” आणि भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजुबाजुच्या राजकीय घडामोडी यांच्यात अनेक वेळा परस्परसंबंध असल्याचा निष्पन्न झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

दरम्यान, “फेक न्यूज”चा प्रचार कसा होतो आणि संदर्भात सर्वसामान्य लोकांच्या वर्तनाचा संपूर्ण अभ्यास करून प्रसिद्ध झालेल्या या पहिल्या संशोधनपर अहवालातून या धक्कादायक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. विशेष म्हणजे हे संशोधन बीबीसी’च्या ‘बियाँड फेक न्यूज’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील उपक्रमाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. तसेच सध्या खोट्या माहितीच्या विरोधात हा प्रकल्प संपूर्ण जगभर राबवला जात आहे. या प्रकल्पाचा भाग असलेली कार्यशाळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल म्हणजे सोमवारी पार पडली.

बीबीसीच्या या संशोधनातुन सिद्ध झालेल्या निष्कर्षानुसार, भारतीय नागरिक हिंसाचार भडकेल अशा स्वरूपाचे संदेश पाठवण्यास जास्त तयार नसतात; परंतु राष्ट्रवादासंदर्भातील संदेश पाठवणे त्यांना स्वतःचे कर्तव्य वाटते. यात डाव्या विचारसरणीची सामान्य लोकं विस्कळित पद्धतीने जोडले आहेत. परंतु, उजव्या विचारसरणीची लोकं एकमेकांसोबत अनेक प्लॅटफॉर्म मार्फत घट्ट बांधलेले असल्याने उजव्या विचारधारांशी संबंधित फेक न्यूज डाव्या विचारांपेक्षा अधिक वेगाने पसरतात हे वास्तव सिद्ध झालं आहे.

केनिया सारख्या देशात राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न, राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे विषय; तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या अफरातफरीची प्रकारणांसंबंधित फेक न्यूज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्वाधिक शेअर केल्या जातात. तर दहशतवाद; तसेच लष्कराविषयीच्या बातम्या नायजेरियात व्हॉट्सअॅपवरून मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. विशेष म्हणजे, मुख्य बातमीचा किंवा मजकुराचा स्रोत जाणून घेण्याची इच्छा भारताच्या तुलनेत या दोन देशांमध्ये अधिक प्रमाणात जाणवते, असे या अहवालात समोर आलं आहे.

संशोधन कसे झाले आणि निष्कर्ष काय

  1. दोन वर्षातल्या फेक न्यूजसंदर्भातील इंग्रजी; तसेच स्थानिक भाषांमध्ये छापून आलेल्या व प्रसारित झालेल्या ४७ हजार बातम्या तपासण्यात आल्या.
  2. भारतातील १६ हजार ट्विटर प्रोफाइल, ३२०० फेसबुक पेज यांचा आढावा घेण्यात आला.
  3. भारतात राष्ट्रवादाची अस्मिता तरुणांसाठी कळीचा मुद्दा आहे. आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत त्यांची राष्ट्रवादी विचारांची ओढ अधिक आहे.
  4. सोशल मीडियावर बातमी किंवा मजकूर शेअर करताना राष्ट्र उभारणीचा संदर्भ आल्यास लोक पडताळणी करणे टाळतात.
  5. सर्वसामान्य माणसे खोटी बातमी शेअर का करतात, हे तपासणे या संशोधनामागचे मुख्य उद्दिष्ट होते. अहवालात भारत, नायजेरिया आणि केनिया या तीन देशांमधील व्यक्तींचा संख्यात्मक; तसेच विविध सामाजिक पातळ्यांनुसार अभ्यास करण्यात आला. पश्चिमेकडील देशांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये फेक न्यूजविषयी सतत चर्चा होते. ऊर्वरित जगात फेक न्यूज हा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे.डॉ. शंतनू चक्रवर्ती, हेड ऑफ ऑडियन्स रिसर्च, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

BBC research on fake news in india and its political connections