अहमदनगर : जर तुमच्याकडे जनावरांसाठी चारा नसेल तर तुमची जनावरे पाहुण्यांकडे जाऊन बांधा, असा विचित्र सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्थानिक शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्यावर समाज माध्यमांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राम शिंदेंचा तो व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर खूप व्हायरल होताना दिसत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी उमटली आहे.

सध्या केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या पाहणीसाठी आले होते. त्यानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने राम शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एका शेतकऱ्याने त्यांची भेट घेतली आणि दुष्काळी स्थितीमुळे आम्हाला चारा उपलब्ध होऊ शकत नाही हे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जनावरांची कशी उपासमार होत आहे हे त्या शेतकऱ्याने मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. यावर संबंधित शेतकऱ्याला सल्ला देताना राम शिंदे यांनी त्या शेतकऱ्याला चारा नसेल तर तुमची जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा विचित्र आणि अजब सल्ला दिला.

प्रसार माध्यमांनी विचारणा केली असता मंत्री महोदयांनी ठरलेले उत्तर दिले की, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला’.

minister ram shinde made controversial statement over farmers issue after drought