कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने ते विविध कामाचे भूमिपूजन करणार आहेत. त्यातील एक कार्यक्रम कल्याण-डोंबिवलीत सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेनं रस्त्यावरील सर्व गतिरोधक हटवले आहेत. तसेच कल्याण-भिवंडी बायपासवरील वाहनांच्या धुरानं काळेकुट्ट झालेले दुभाजक महापालिकेनं टँकरच्या पाण्यानं धुऊन एकदम स्वच्छ केले आहेत.
धक्कादायक म्हणजे केडीएमसीनं आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरून मोदींना दुर्गंधी येऊ नये म्हणून थेट कचऱ्यावर सुद्धा परफ्यूमची फवारणी केली आहे.त्यामुळे आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमधून मोदींच्या दौऱ्यादरम्यान दुर्गंधी सुटू नये आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी सर्वात घाणेरडे शहर असा शिक्का मारलेले कल्याण-डोंबिवली शहर स्वच्छ असल्याचा फिल्मी देखावा महापालिकेने केला आहे.
त्यात भर म्हणजे कोणी आग लावू नये म्हणून आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर १६ विशेष सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो रेल्वेमार्गासह पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो व सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी कल्याणमधील फडके रोडवर येणार आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कल्याण-डोंबिवली येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी याच शहराबाबत ‘मी पाहिलेल्या घाणेरड्या शहरांपैकी एक हे शहर असल्याचं’ विधान केलं होतं. आज त्याच पक्षाचे सर्वोच्च पदावर बसलेले मोदी येताच थेट कचऱ्यावर दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्युम मारण्यात आले आहे.
