केरळ: शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात आज २ महिलांनी प्रवेश करून दर्शन घेतल्याची घटना ही विनाशकारक असल्याचं भाजपकडून वक्तव्य केलं आहे. आज पहाटे बिंदू आणि कनकदुर्गा या पन्नाशीच्या आतल्या महिलांनी शबरीमलामध्ये कडेकोट पोलिसांच्या गराड्यात मंदिरात प्रवेश केला आणि शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली.
सुप्रीम कोर्टाने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश दिल्यानंतर सुद्धा प्रचंड विरोधाचा सामना मंदिरात जाऊ इच्छिणाऱ्या महिलांना करावा लागला होता. त्यानंतर महिलांच्या अनेक समाजसेवी संस्थांनी सुद्धा प्रवेशाचे प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यश आले नव्हते. राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आदेश पाळण्याची ग्वाही दिली आणि महिला भाविकांना पुरेपूर बंदोबस्त देण्याचे सुद्धा मान्य केले होते.
मात्र या निर्णयाच्या अमलबजावणीस भक्तांकडून आणि स्थानिकांकडून प्रचंड विरोध झाल्यामुळे अद्याप महिलांनी मंदिर प्रवेश केला नव्हता. परंतु, आज पहाटे २ महिलांनी परंपरा मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला स्वतः केरळच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. परंतु, संतापजनक म्हणजे, भाजपाचे माहिती व तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी ही घटना खरी असेल तर ती विनाशकारी असल्याचे ट्विट केले आहे. याआधीही भाजपाच्या केरळमधल्या नेत्यांनी परंपरा मोडण्यास विरोध केला होता.
त्यामुळे महिलांबाबत भाजपची विचार करण्याची मानसिकता यावरून स्पष्ट होते आहे असं विरोधकांनी म्हटलं आहे. यावरून भाजपवर चारही बाजूने टीका होण्याची शक्यता आहे.
Have the Communists desecrated Sabarimala shrine by facilitating entry of women of restricted age group into the temple? Devastating, if true.
— Amit Malviya (@amitmalviya) January 2, 2019
