सांगली : रासप पक्षाची औकात शून्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो चौकाचौकात पक्षाची औकात निर्माण करा. आणि तशीच वेळ पडल्यास स्वतःची जमीन विका, पण पक्षाचं ऑफिस काढाच, असा धक्कादायक आणि अजब सल्ला राज्याचे पशु संवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी रासपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिला आहे. ते सांगलीत एका पक्ष कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे.

मी स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर राज्याचा मंत्री झालो आहे. समाजाने रासप पक्षाला काही दिले नसल्याचे विधान सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले आहे. दरम्यान, त्यांनी सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीवर पदाधिका-यांना तसेच कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले आहे आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पाठीमागे नाराजी व्यक्त केली आहे.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा तिन्ही जिल्ह्यात पक्षाची जराही ताकत नसल्याने रासपची या चौकात अजिबात औकात नाही. त्यामुळे आता नाटके जरा बंद करा. आणि जागोजागी पक्षसंघटना मजबूत करा. तुमच्या जमिनी विका आणि पक्षाचे ऑफिस काढा. तुम्हीच चौकाचौकात पक्षाची औकात निर्माण करा. २ नंबरचे धंदे बंद करा, अशा अजब कानपिचक्या सुद्धा त्यांनी रासपच्या कार्यकर्त्यांना संवाद साधताना दिल्या.

‘मी राज्यातील धनगर समाजाच्या जीवावर राजकारण करत नाही’ अशा वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर जानकर वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे ते सांगलीत काय बोलणार, याकडे प्रसार माध्यमांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.

state minister mahadev jankar orders party workers to start party office