मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीने बेस्ट कामगारांच्या मागण्यांबाबत मुंबई हायकोर्टात अहवाल सादर केल्यानंतर बेस्टचा सलग ८-९ दिवसांपासूनचा संप मिटेल असे वाटत असताना आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. बेस्ट कामगारांना एक रुरुपयासुद्धा द्यायचा नसल्याने तुम्ही कामगारांच्या भानगडीत पडू नका, असे शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा धक्कादायक आरोप कामगार नेते शशांक राव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला.
त्यामुळे यापुढे लेखी आश्वासनाशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असे त्यांनी काल रात्री कामगार मेळाव्यात सरकारला ठणकावून सांगितले. यामुळे आज सुद्धा बेस्ट कामगारांचा संप सुरूच राहणार आहे. दरम्यान, सकाळी होणाऱ्या सुनावणीत कोर्टात काय भूमिका घेते, यावर या संपाचे पुढचे भवितव्य अवलंबून राहील असे वृत्त आहे.
तर आमचा ‘मातोश्री’वर अजिबात विश्वास नाही, कारण मागील वर्षी मातोश्रीवर विश्वास ठेवून संप मागे घेतला. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री या संपावर गप्प का? याबाबत जाणून घेतले असता, उद्धव ठाकरे यांनीच कामगारांना पैसे न देण्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कानावर आले आहे, असा सनसनाटी आरोप राव यांनी केला. कारण शिवसेनेलाच बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण करायचे आहे. कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाच आपण आता देशोधडीला लावायचे आहे, असा हल्लाच त्यांनी या वेळी भर सभेत चढविला. तसेच कालपासून हा संप फोडण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून ते ‘उद्या कामावर चला’, असा संदेश जाणीवपूर्वक पसरवून संप फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, बेस्ट कामगारांचा आम्ही गिरणी कामगार होऊ देणार नाही. त्याउलट आम्ही कामगारच इतिहास घडविणार, असा दावा राव यांनी बोलताना केला.
