मुंबई : भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड होत आहे. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले असून, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे.

संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी म्हणजे ३१ डिसेंबर २०१८ मध्ये सदर पदासाठी उमेदवारांची परीक्षा पार पडली. सध्या त्याच उमेदवारांची कामावर रुजू होण्याची शेवटची प्रक्रिया सुरु आहे. अंतिम निवड झालेल्या १३ उमेदवारांपैकी ८ पुरुष तर ५ महिला उमेदवार आहेत. त्यापैकी २-३ उमेदवारांनी अजून सुद्धा अंतिम कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.

धक्कदायक म्हणजे वेटर या पदासाठी निवड झालेल्या एकूण १३ उमेदवारांपैकी १२ उमेदवार हे पदवीधर आहेत तर १ उमेदवार बारावी उत्तीर्ण आहे. दुसरं म्हणजे कमीत कमी इयत्ता ४थी पास अशी शिक्षणाची अट असताना सुद्धा प्रशासनाने पदवीधरांची वेटर पदासाठी निवड केल्याने त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात येते आहे. महत्वाचं म्हणजे वेटर या पदासाठी सुद्धा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

Unemployment facts in maharashtra state