मुंबई : महाआघाडीबाबत तर्कवितर्क जोडले जात असताना मनसे एकाबाजूला काही ठराविक लोकसभा मतदारसंघात तयारीला लागली होती. मनसे नक्की कोणत्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवणार ते अधिकृतपणे जाहीर झालं नसलं तरी, त्यावरच सविस्तर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी कालच बैठकीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सध्या कृष्णकुंजवर सध्या सर्व नेते – पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरु झाली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं होतं, याची संपूर्ण आकडेवारी पक्षाकडे याआधीच आली आहे. त्यानुसार कल्याण लोकसभा मतदासंघ जिथे प्रमोद पाटील यांना मोदी लाटेत आणि भाजप-शिवसेना-आरपीआय युती असताना देखील १ लाख २२ हजाहून अधिक मतं पडली होती. विशेष म्हणजे याच मतदारसंघात मोदींनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली होती. त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघात जोर लावून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना पराभूत करून कल्याण-डोंबिवलीमार्गे ठाण्यात सुद्धा शिंदेशाहीला धक्का देण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ जवळपास निश्चित समाजला जातो आहे.

त्यानंतर मुंबई, ठाणे आणि नाशिमधील निवडक मतदासंघावर लक्ष केंद्रित करून हमखास २-३ जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यासोबतच अर्थशक्ती सुद्धा लावण्याची मनसेने ठरवल्याचे समजते. त्यामुळे काही ठराविक लोकसभा मतदारसंघ निवडणूक राज ठाकरे यांच्या शक्य तेवढ्या सभा या निवडक मतदारसंघात आयोजित करून विरोधकांना कोंडीत पकडले जाऊ शकते. दरम्यान, सध्या भाजप-शिवसेनेच्या कामावर मोठा मतदार वर्ग नाराज असून तो काँग्रेस-राष्ट्रवादीला देखील मतदान करू इच्छित नसल्याने, तो मोठ्या प्रमाणावर मनसेकडे वर्ग होण्यास मोठी संधी आहे. त्यासाठी समाज माध्यमं आणि मार्केटिंगचे आधुनिक तंत्र सुद्धा मनसे पणाला लावू शकते. परंतु, या निवडणुकीत राज ठाकरे राजकीय मैत्रीत स्वतःच्या पक्षाचे कोणतेही नुकसान करून घेण्याच्या मनस्थितीत नसतील, अशीच शक्यता अधिक आहे.

raj thakceray called meeting at krushnakunj on loksabha election