मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष देखील जोरदार पणे कामाला लागला आहे. भाजप-शिवसेना युती झाली तरी देखील खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष राज्यातील ५ मतदारसंघांमध्ये तगडे उमेदवार उभे करणार आहेत. हे पाचही महत्वाचे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. सध्या शिवसेनेत अनेक वरिष्ठ पदाधिकारी युती केल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे कदाचित अशांनाच आर्थिक रसद पुरवून शिवसेनेविरुद्ध तगडं आवाहन उभं केलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व अन्य एका मतदारसंघांत उमेदवार उभे करणार आहेत. ‘आपला पक्ष स्वतंत्र असून, पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. प्रत्येक महसूल विभागात एक उमेदवार उभा केला जाईल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला फार काही यश मिळणार नाही. ज्या काही जागा मिळतील त्या भाजपमुळे मिळतील, अशी पुष्टी राणे यांनी जोडली. भाजप आणि शिवसेना युतीचा निर्णय झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राणे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली. आपली भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट केल्याचे देखील राणे यांनी सांगितले.
