नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची स्तुती करताना तुमच्या देशाचा ‘चौकीदार चौकंन्ना’ असे असं म्हटलं होतं. परंतु आता नुकत्याच घडलेल्या घटनेने ते तोंडघशी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण राफेल लढाऊ विमानांच्या डीलमधील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना स्वतः महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. परंतु, या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

त्यालाच अनुसरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी मोदी यांना थेट लक्ष करत आम्ही राफेलचा घोटाळा उघड केला होता आणि ते सत्य असल्याचं सिद्ध होत आहे. तसेच किंमती निश्चिती करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणांना मोदींनी दूर करून, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यालयाने राफेलच्या किमती वाढवण्यासाठीच तसेच अनिल अंबानी आणि स्वतःच्या फायद्यासाठी थेट बोलणी सुरु केल्याचं आता सिद्ध होत आहे. तसेच सरकार चोरी झालेल्या कागदपत्रांवर जी आदळआपट करत आहे, त्यावरून ते खरं असल्याचं सुद्धा सिद्ध होत आहे असं ते म्हणाले. त्यामुळे देशात मोदींवर आरोप करणाऱ्यांवर जशी ताबडतोब क्रिमिनल कारवाई सुरु होते तशी त्यांच्यावर आणि त्या व्यवहाराशी संबंधित सर्वांचीच चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्यामुळे आता भाजप यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार तेच पाहावं लागणार आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी आणि भाजप चांगलेच तोंडघशी पडल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

Rahul Gandhi press conference over rafael deal important documents gone stolen from defence ministry