मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली असून त्यांच्या सभांना जनतेकडून मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. परंतु, सभेत होणाऱ्या या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बहुजन वंचित आघाडीबाबत भाष्य केले आहे. बहुजन वंचित आघाडीचा आरपीआयवर (आठवले गट) कोणताही राजकीय परिणाम होणार नाही. माझे मित्र प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून नवीन राजकीय आघाडीची स्थापना केली आहे. त्यांच्या सभांना उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. परंतु याचे रुपांतर मतांमध्ये होणार का?, बहुजन वंचित आघाडीला जागा जिंकण्यात यश येणार नाही, असा दावा त्यांनी केला.

आठवले पुढे म्हणाले, २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाने युतीतील छोट्या पक्षांना एकूण ४ चार जागा सोडल्या होत्या. यात आरपीआयला सातारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा येथील जागा आणि राष्ट्रीय समाज पक्षाला बारामतीची जागा दिली होती. मात्र आता त्यांनी आमच्या पक्षाला किमान १ जागा द्यावी. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहू शकेल. मी नरेंद्र मोदी किंवा फडणवीस सरकारविरोधात नाही, या दोन्ही सरकारने आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या, असे त्यांनी सांगितले.

Prakash Ambedkars vanchit bahujan agadhi dont succeed in winning loksabha seats says ramdas athawale