मुंबई : भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना, करण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते मिलिंद पखाले यांनी केला असून पूर्व विदर्भातील पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भारिप’ला सोडचिट्ठी देत असल्याचे जाहीर केले.
मिलिंद पखाले यांनी भारिप बहुजन महासंघप्रणित वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या एकूणच राजकारणावर टीका केली. ते म्हणाले, राज्यात काहीही ताकद नसताना ४७ जागी उमेदवार उभे करून वंचित बहुजन आघाडीने आरएसएस व भारतीय जनता पक्षाला थेट मदतच केली आहे असा आरोप देखील पत्रकार परिषदेत केला आहे.
तसेच आंबेडकरी जनतेसह वंचित बहुजनांची मते कुजवण्याचे काम यातून झाले आहे. वंचित हे नवे लेबलही आम्हाला मान्य नसल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, यापूर्वी देखील अनेक विरोधी पक्षांनी असाच दावा केला होता आणि वंचित बहुजन विकास आघाडीला आर्थिक रसद देखील भाजपच पुरवत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता. मात्र आता थेट पक्षातील वरिष्ठ पदाधिकारीच त्याला दुजोरा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
