Aaditya Thackeray | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शनिवारी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर जे आधीच अपेक्षित होतं तेच झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयावरील भव्य मोर्चानंतर शिंदे गटाकडून जे अपेक्षित आहे तेच घडण्यास सुरुवात झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत सामान्य जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारण्यासाठी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या मुंबई महानगपालिकेतील प्रशासकीय टेण्डरशाहीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी नवे प्रयोग सुरु झाले आहेत.

जे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करतात त्यांना कोणते आरोप करायचे ते आधीच ठरवून दिलेलं असतं. विशेष म्हणजे यामध्ये अशा अनेक नेत्यांचे प्रवेश झाले आहेत ज्यांची सामान्य जनतेसमोर शून्य राजकीय पत आहे. या नेत्यांचा केवळ वापर करून नंतर त्यांना बाजूला सारलं जाणार एवढा एक कलमी कार्यक्रम सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे जो पदाधिकारी स्वतःच केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या कचाट्यात अडकला आहे त्याने असे आरोप करणे म्हणजे समाज माध्यमांवर विनोदी चर्चा एवढीच त्याची किंमत झाली आहे. तोच प्रकार आता राहुल कनाल यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर पाहायला मिळतोय.

शिंदे गटातील प्रवेशानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाल्यानंतर कनाल म्हणाले की, त्यांनी पक्ष बदलला आहे, कारण विद्यमान सरकारने दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणांची चौकशी सुरू केली आहे.

राहुल कनाल आयकर विभागाच्या रडारवर :
राहुल कनाल हे नुकतेच आयकर विभागाच्या रडारवर आले होते. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी झाली होती. आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली होती. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं होतं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली होती. त्यानंतर राहुल कनाल स्वतःच्या बचावासाठी शिंदे गटात सामील झाले असून त्यांना प्रवेशावेळी आदित्य ठाकरेंवर आरोप करण्याचे आदेश देण्यात आले होते अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे.

News Title : Rahul Kanal join Shinde camp check details on 02 July 2023.

शिंदे गटाने आखून दिलेल्या ‘स्किप्टेड’ आरोपांसाठी जनतेत शून्य राजकीय पत असलेल्या नेत्यांचे पक्ष प्रवेश, लोकांचे मूळ मुद्दे बाजूला करण्याचा कट