हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला ऐतिहासिक आणि स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचा सुपडा साफ झाला. दरम्यान पक्ष प्रमुख जगनमोहन रेड्डी आज मुख्यमंत्रपदाची शपथ घेणार होते. कार्यक्रम स्थळावर जोरदार तयारीही करण्यात आली होती. परंतु, बुधवारी रात्री आलेल्या जोरदार वादळ आणि पावसामध्ये कार्यक्रम स्थळच उद्ध्वस्त झाले आहे.

जगनमोहन रेड्डी हे आज दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी शपथ घेणार आहेत. त्यांच्या पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. तर लोकसभेसाठी २५ पैकी २२ जागांवर खासदार निवडून आले आहेत. रेड्डी यांच्या शपथविधीसाठी राज्यपाल नरसिंह राव बुधवारी दुपारीत हैदराबादला पोहोचले आहेत.

मात्र, बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे त्यांच्या शपथविधीचे कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त झाले आहे. पेंडॉल उडून गेला असून ठिकठिकाणी लावलेले बॅनरही फाटले आहेत. तसेच सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रेड्डी हे शपथविधी पुढे ढकलतात की बंदिस्त हॉलमध्ये घेतात याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आंध्र प्रदेश: जगनमोहन रेड्डींच्या शपथविधीवर निसर्गाची वक्रदृष्टी