कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान त्यांनी ईव्हीएम विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी देशभरातील इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे.

ममता यांनी ईव्हीएम मशीनसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांचा तपास करण्यासाठी ‘फॅक्ट-फाइंडिंग’ समितीची स्थापन करण्याची गरज अत्यंत असल्याचं म्हटलं आहे. दंर्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ममता बॅनर्जी यांनी काल पक्षाचे आमदार आणि राज्यातील मंत्र्यांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयावर गंभीर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

आम्हाला भारतात लोकशाही जिवंत ठेवायची आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात पश्चिम बंगालमधून होईल’ असं ममता यांनी पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने २३ जागांचा दावा केला होता, पण त्यांनी लोकसभेच्या १८ जागा जिंकता आल्या. मतदानाची टक्केवारी पाहता यंदा तृणमूलला मिळालेल्या मतांचं प्रमाण ४ टक्क्यांनी वाढलं असल्याचं दावा देखील ममतांनी यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

ममता बॅनर्जी ईव्हीएम विरोधात आंदोलन पुकारणार; इतर विरोधी पक्षांनाही आवाहन