मुंबई : सध्या राज्यात अनेक घोटाळे बाहेर येत असून, त्यात राज्यातील अमराठी नेते महाराष्ट्र घोटाळ्यांनी पोखरत असल्याचं उघड होत आहे. भाजपच्या या गुजराती नेत्यांचे देशातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांशी घनिष्ट संबंध असून, त्यांच्यासाठी कायदे धाब्यावर बसवून बांधकामं केली जात आहेत. त्यामध्ये एस. डी. कॉर्पोरेशन या बांधकाम कंपनीचं नाव सर्वात पुढे आहे. कांदिवली पूर्वेतील ठाकूर व्हिलेज येथे म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या ५२ एकर जागेवर सुरु असलेला तब्बल १२ हजार कोटींचा प्रकल्प ते ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात, त्याच विकासकासाठी याच गुजराती नेत्यांनी अक्षरशः नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत.
ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. मेहता यांनी ही फाइल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. परंतु, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर मेहता यांनी चुकून हा प्रकार घडल्याची सारवासारव केली होती. यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
पारदर्शक कारभाराचा दिखावा करणाऱ्या फडणवीस सरकारचा बुरखा फाटला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्यात लोकायुक्तांनी दोषी ठरविल्याची माहिती समोर आली आहे असून स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांना हा मोठा धक्का मनाला जात आहे.
दरम्यान, लोकायुक्तांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश मेहता यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
