सोलापूरः धनगर, लिंंगायत, मराठा, मुस्लिम समाजातील नागरिकांना आरक्षण लागू करा, नाहीतर सरसकट सर्वांचेच आरक्षण रद्द करा. आरक्षणामुळे सर्वच जाती धर्मात भांडणे लागली आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्मातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना सरकारने आरक्षण लागू करा, अशी मागणी एनसीपीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सोलापुरात केली. सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले, आरक्षणामुळे एकूण लोकशाहीच संपुष्टात येत आहे. त्यामुळे सरसकट सर्वांचेच आरक्षण रद्द करून टाका. उगाच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वधर्म समभावाची शिकवण देत बसू नका, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर ईव्हीएम मशीन तोडा आणि माणसे जोडा, असे जाहीर आवाहन यावेळी उदयनराजे यांनी केले. तुम्ही ईव्हीएमवर झालेल्या मतदानातून निवडून आलात, तरीही त्यावर संशय घेताय, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, माझं ठाम मत आहे की निवडून येणं महत्त्वाचं नाही. मी यापूर्वीचा पराभव पचवला आहे. मात्र यावेळी माझ्या मताधिक्यात दोन-सव्वा दोन लाखांनी घट झाली. सोलापुरातही ज्यांच्या जाहीर सभांना गर्दी झाली ते पराभूत झाले. ज्यांना कोण ओळखत नाही, असे लोक निवडून आले. सगळीकडे दोन-अडीच लाखांचा फरक आहे. फेरनिवडणूक व्हावी, अशी माझी मागणी आहे.
