मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून झालेली दुर्घटना हि महापालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात आहे असं वक्तव्य सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. संजय राऊत यांच्यामते पावसाळा सुरु होण्या आगोदर उद्धव ठाकरेंनी स्वतः मुंबईभर फिरून नालेसफाईची पहाणी केली होती.

अनधिकृत बांधकामांमुळे अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात. मालाडमध्ये झालेली जीवितहानी अपघातानं झाली आहे आणि ते पालिकेचं अपयश नाही. असे अपघात देशात कुठेही आणि कधीही घडू शकतात, असंदेखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

परंतु सर्वसामान्य मुंबईकराला पडलेला प्रश्न म्हणजे जर असे अपघात अनधिकृत बांधकामांमुळे घडत असतात तर मग पालिका नक्की करते तरी काय? त्यांच्या नाकाखाली हे सगळे अनधिकृत धंदे चाळतातच कसे? मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, मुंबईमध्ये होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची त्यांना खबर नाही का? असे नाना विविध प्रश सर्वसामान्य लोकांना पडत असतात.

संजय राऊत आपल्या विधानाला बळकटी देण्यासाठी रशियाचा दाखला देत म्हणाले “रशिया तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे आहे, मात्र तरीही सध्या तिथे पूर आला आहे” असं म्हणत राऊत यांनी पालिका प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. कालच दिलेल्या मुलाखतीत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यामते मुंबई तुंबलीच नाही, गाड्या रस्त्यांवर धावत आहेत आणि मुंबई सुरळीत आहे. केवळ पाणी साचलं आहे, अशी सारवासारव महाडेश्वर यांनी केली.

यंदा नालेसफाईची कामं व्यवस्थित झाल्यानं पाणी तुंबणार नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र पालिकेच्या दाव्याची पावसानं अवघ्या आठवड्याभरात पोलखोल केली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागातही गुडघाभर पाणी साचलं.

अनधिकृत बांधकामामुळे अशा घटना घडतात पण त्याला पालिका जबाबदार नाही – संजय राऊत