मुंबई : एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसआरए घोटाळ्याच्या आरोपांवरून पायउतार करण्यात आलेले मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण खात्याचा गैरफायदा घेत एस.डी. कॉर्पोरेशनसंबंधित एसआरए प्रकल्पात प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून बांधकाम व्यवसायिकाकासाठीच काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी नेमण्यात आलेल्या लोकायुक्त अहवालात प्रकाश मेहता यांच्यावर जाणीवपूर्वक केलेल्या त्रुटींवर बोट ठेवण्यात आले होते.
ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात विकासाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासाला एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप मेहतांवर आहे. विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. इतकेच नव्हे तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मेहता यांना वगळण्यात आले होते.
दरम्यान राज्य सरकारने अलीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रकाश मेहता यांना वगळले. लोकायुक्तांचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांनी दडवून ठेवला. त्यामुळे भ्रष्टाचार झाला हे शेंबडे पोरगं पण सांगू शकते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. इतकच नव्हे तर त्यामुळे मेहतांना केवळ घरी पाठवून काही होणार नाही. प्रकाश मेहतांवर गुन्हा हा दाखल व्हायलाच हवा, अशी मागणीही पाटील यांनी केली.
जयंत पाटील यांनी विधानसभेत देखील ही मागणी केली आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.
राज्य सरकारने अलीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रकाश मेहता यांना वगळले. लोकायुक्तांचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांनी दडवून ठेवला. त्यामुळे भ्रष्टाचार झाला हे शेंबडे पोरगं पण सांगू शकते. तेव्हा त्यांना केवळ घरी पाठवून काही होणार नाही. प्रकाश मेहतांवर गुन्हा हा दाखल व्हायलाच हवा! pic.twitter.com/0DwbPXq7v2
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) July 2, 2019
