नवी दिल्ली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (८ जुलै) मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेणार आहेत. EVM मशिन्सच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्यामुद्यावर राज हे आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. मनसेसहीत अनेक राजकीय पक्षांनी EVMवर संशय दाट व्यक्त केला होता. EVM हॅक होऊ शकतं त्यामुळे यापुढच्या निवडणुका या EVM मशिन्सव्दारेच घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. राज ठाकरे आजच दिल्लीत दाखल झालेत.

राज ठाकरे यांनी याआधीही अनेकदा EVMच्या वापरासंदर्भात आक्षेप घेतले होते. राज्यात नव्हे तर देशात देखील भाजपाची अनेक मतदारसंघात कोणतीही ताकद नसताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून आले होते आणि त्याला केवळ मोदी त्सुनामी होती म्हणून निवडणून आले अशी पुडी सोडण्यात आली. वास्तविक नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी वातावरण असताना जे यश मिळाले त्यानंतर ईव्हीएम’वरील संशय अधिकच गडद झाला होता. देशात केवळ भाजपचाच बॅलेट पेपरला विरोध असल्याने विरोधकांच्या मनात अधिकच संशय बळावला आहे. तसेच निवडणूक घेतल्यास बॅलेट पेपरपेक्षा अधिक खर्च येत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मग मुख्य निवडणूक आयोग ईव्हीएम’ने निवडणुका घेण्यास का अडून बसला ते देखील विरोधकांना समजण्यापलीकडे आहे.

काही दिवसांपूर्वी अनेक माजी सनदी अधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे सर्वबाजुने निवडणूक आयोग देखील भाजपसोबत संशयाच्या भवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष त्यांच्या विविध मागण्या घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहेत, मात्र त्यानंतर काहीच हालचाल न दिसल्यास आणि विरोधकांना केवळ गृहीत धरण्याचा हट्ट जर निवडणूक आयोग दाखवेल तर मनसे रस्त्यावर उतरून ईव्हीएम’ला विरोध करेल अशी दाट शक्यता वर्तविण्यात येते आहे.

राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत आपलं राजकारण हे महाराष्ट्रापुरतच मर्यादीत ठेवलं होतं. दिल्लीत ते कधी फारसे गेले नाहीत. कुठल्या प्रश्नावर दिल्लीत जाऊन गाठीभेटी घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. दिल्लीत संसदेचं अधिवेशनही सुरू आहे, त्यामुळे राज हे काही नेत्यांच्या भेटीगाठीही घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘ईव्हीएम टू बॅलेट पेपर’, राज ठाकरे दिल्लीत दाखल; मनसे आक्रमक होण्याची शक्यता