पुणे : रात्री अपरात्री गाड्या पेटवण्याचे प्रकार हे पुणेकरांना नित्त्याचे अनुभव झाले आहेत. यापूर्वी देखील असेच प्रकार काही गावगुंडांनी आणि माथेफिरूंनी केला आहेत, ज्यामध्ये पुणेकरांच्या मालमत्तेचे नाहक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात पोलिसांना देखील अशा अनेक प्रकरणात कोणताही सुगावा लागत नसल्याने पुणेकर देखील हवालदिल झाले आहेत.

आता गाड्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या पेटवून देण्याचा प्रकार पुण्यात मध्यरात्री पुन्हा घडला आहे. पुणे सातारा रोडवरील बालाजीनगर येथील एलोरा पॅलेस येथे मध्यरात्रीच्या सुमारास पार्क केलेल्या दुचाकींना आग लावण्यात आली. या आगीत तब्बल ७ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही घटना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली जेव्हा पुणेकर गाढ झोपेत होते.

पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी बालाजीनगर येथे गाड्यांना आग लागल्याचा कॉल स्थानिक अग्निशमन यंत्रणेला आला होता, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. त्यानंतर कात्रज येथील गाडी तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आली होती. दरम्यान काही वेळातच ही आग विझविण्यात आली. या आगीत एकूण ३ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून ३ अर्धवट जळाल्या अवस्थेत आहेत. तर एका गाडीला आगीची थोडीच झळ पोहचली आहे. या गाड्या जेथे पार्क केल्या होत्या, त्याच्या वरील बाजूने काही तारा गेल्या होत्या. दरम्यान सहकारनगर पोलीस ठाण्याकडून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पुण्यात माथेफिरूंकडून पुन्हा ७ दुचाकी गाड्या पेटवून देण्याचा प्रकार घडला आहे