बंगळुरू : कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा राजीनाम्यामुळे सुरु झालेले नाट्य आता नव्या वळणावर येवून ठेपले आहे. याचिका दाखल करणाऱ्या आमदारांना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर करुन आपली बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

मुंबईत आलेल्या कर्नाटकातील बंडखोर आमदारांनी राजीनामे मंजूर करून घेण्यासाठी बंगळुरूला जाणे भाग पडेल, हे ओळखून ते टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला. बंडखोर आमदारांना एकप्रकारे हा धक्काच मानला जात असून या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष आमचे राजीनामे मंजूर करण्यास नियमबाह्य पद्धतीने टाळाटाळ करत असल्याने त्यांना ते मंजूर करण्याचा आदेश द्यावा, असे या आमदारांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही स्वखुशीने राजीनामे दिले असल्याने, पक्षांतरबंदी कायद्याच्या उल्लंघनाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे राजीनाम्यांना काटशह देण्यासाठी आम्हाला अपात्र घोषित करण्यासाठी काँग्रेसने केलेला अर्ज निरर्थक असल्याने विधानसभा अध्यक्षांना त्यावर सुनावणी घेण्यास मनाई करावी, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा, बंडखोर आमदारांना न्यायालयाचे आदेश