कणकवली : रस्त्यांवर खड्डे असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान २-३ दिवसातील नाट्यमय घडामोडीनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला देखील आक्रमक आंदोलनावरून अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी माझं कौतुक केलं असतं. शाब्बास नितेश तू केलंस ते चांगलं केलंस असं ते म्हटले असते असं देखील नितेश राणेंनी स्पष्ट केलं होते. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आमदार नितेश राणे यांना प्रत्येक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात स्वतः हजेरी लावावी लागणार आहे. त्यावर विचारलं असता, बरं झालं त्यामुळे दर रविवारी कणकवलीत यायला मिळेल. कोर्टाने माझा प्रचार सोपा केला अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणेंनी दिली आहे. तसेच नितेश राणे त्यांची भूमिका फेसबुक जाहीरपणे लाइव्ह करून मांडणार आहेत. त्यासंदर्भातले एक ट्विट देखील त्यांनी केले आहे.
कोकणातील त्या घटनेनंतर नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना चिखलफेक प्रकरणात ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टाने त्यांना ९ जुलै पर्यंत कोर्ट कस्टडीमध्ये धाडण्याचा निर्णय दिला होता. परंतु त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी स्वतःच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलं आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला या आक्रमक आंदोलनाबद्दल शाबसकीच दिली असती असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला. सदर प्रकरणी आम्हाला स्थानिक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा दिला. आंदोलन केलं ते योग्यच झालं अशी जुन्या शिवसैनिकांची देखील भावना होती. विशेष म्हणजे आमच्या आंदोलनानंतर आता जोरदारपणे रस्ता तयार करण्यास सुरूवात झाली आहे, हे देखील आमदार नितेश राणे यांनी नमूद केले आहे.
