मुंबई : गोवा, कर्नाटक या राज्यांमध्ये जे काही घडलं आहे ते लक्षात घेता भाजपला सत्तेची हाव सुटली असल्याची टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अन्य पक्षांतून लोक भाजपमध्ये जात आहेत. मात्र, लवकरच भाजपामधूनही लोक काँग्रेसमध्ये येतील, अशी भविष्यवाणी थोरात यांनी केली. विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे एकनाथ खडसे यांना भाजपने योग्य तो सन्मान दिला नाही. त्यांच्यासारखे अनेक जण भाजपमध्ये दुःखी आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील. दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेनंतर ही निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे, असं थोरात यांनी म्हटलं.

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीसाठी थोरात नाशिकमध्ये आले होते. पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाने नाराज आहेत. मात्र, त्यांची नाराजी दूर करून निवडणुकीत यश मिळवायचं आहे. यासाठी कार्यकर्ते नाराजी बाजूला ठेवून नव्या जोमाने काम करतील. वंचित बहुजन आघाडीवर भाष्य करताना आघाडीसाठी त्यांना पत्र पाठवलं आहे, असं थोरात यांनी सांगितलं.

राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे जनता ठरवेल. मग, भाजप-शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करतेच कशी, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. सध्या राज्यात दुष्काळ आहे मात्र सरकार यावर काहीच बोलत नाही आहे. स्वतःचा प्रचार करण्यासाठी यात्रा काढण्यातच मग्न आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

लवकरच भाजपमधून लोकं काँग्रेसमध्ये येतील: बाळासाहेब थोरात