मुंबई : मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांचे भारतीय जनता पक्षातील आणि शिवसेनेतील प्रवेश हा सत्तेचा गैरवापर करत, प्राप्तिकर विभाग आणि ईडीच्या मार्फत दबाव टाकून करून घेतले जात आहेत असे आरोप धक्कादायक आरोप विरोधकांनी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच कागलच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाने अचानक धाडी घातल्या होत्या.

त्यावेळी त्यांच्या घराबाहेर सामान्य लोकांची आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. सत्ताधारी ते सर्व त्यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव आणण्यासाठी करत असल्याचा आरोप केला होता. तत्पूर्वी कोल्हापूर येतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर निमंत्रण सर्वांसमोर दिले होते. मात्र त्याला भीक न घालता, हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांनाच शरद पवार यांच्याबद्दलच्या स्वतःच्या भावना बोलून दाखवल्या होत्या आणि त्यांना तोंडशी पाडलं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्याने अनेकांनी त्या दबाव तंत्रावर संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या.

केंद्र आणि राज्य सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. इडी आणि सीबीआयचा गैरवापर करून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना धमकावले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी पवार भाजपवर आरोप करत आहेत, अशी प्रतिक्रीया जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीत दिली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. लोकशाहीला आघात करण्याचा हा प्रकार आहे, आरोप पवार यांनी केला आहे.

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांना पक्ष टिकवायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत.स्वतःचे अपयश लपवण्यासाठी पवार भाजपवर आरोप करत आहेत. सगळ्यांचा विश्वास आता भाजपवर आहे. ज्यांनी चुकीचे काम केले आहे त्यांना चौकशीला सामोरे जावेच लागणार असा पलटवार महाजनांनी यावेळी केला.’

काँग्रेस-राष्ट्रवादीला पक्ष टिकवायचा असल्याने आरोप: गिरीश महाजन