जम्मू : अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णयाचा इतर कुठल्याही मुद्द्यांशी संबंध जोडू नका; तसंच कुठल्याही अफवा न पसरवता शांत रहा, असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातल्या राजकीय पक्षांना केलं आहे. अमरनाथ यात्रा सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण आहे, असं सांगत काही प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली होती.

तसेच अमरनाथ यात्रा 4 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर घाटीत थांबण्याचा कालावधी कमी करून लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सांगितले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव (गृह) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी ऍडव्हायजरीत भाविकांना आणि पर्यटकांना यात्रेचा कालवधी कमी करण्यास आणि लवकरात लवकर परत जाण्यास सांगितले आहे.

दरम्यान काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना नव्याने सुट्टया मिळणार नाहीत तसेच जे सुट्टीवर आहेत त्यांना माघारी बोलवण्यात येईल असे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका हे काश्मीरमध्ये जवानांची संख्या वाढवण्यामागचे मुख्य कारण असल्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनाचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरमध्ये केंद्र सरकारकडून काही तरी मोठा प्लॅन करण्यात येत असल्याच्या संशय व्यक्त केला आहे. बारामुलामध्ये पत्रकारांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या , ‘जर भाजपाच्या प्रमुख नेत्यांची भाषणे ऐकली आणि खोऱ्यात केंद्रीय सुरक्षा दलाची तैनात पाहिली तर काश्मीरच्या कोणत्याही नागरिकांमध्ये शंका निर्माण होऊ शकते.

जम्मू-काश्मीरमध्ये तणावपूर्ण स्थिती; PDP व NCची आपत्कालीन बैठक; CRPFच्या सुट्या रद्द