मुंबई : कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. राज ठाकरेंना दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे. पण माझा नवरा घाबरणार नाही. निवडणुका जवळ आल्याने माझ्या नवऱ्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न आहे. मात्र चौकशीसाठी राज ठाकरेंना बोलविलं तर नक्की जाणार, सगळे पेपर त्यांना देऊ असं शर्मिला यांनी सांगितले आहे. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे सरकारचं आमच्यावर प्रेम आहे म्हणूनच नोटीस आली आहे असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच भारतीय जनता पक्ष डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष विरोधकांवर तुटून पडलेत. सरकारी संस्थांचा वापर हे नेहमीचा गळ आहे. ईडीचा अर्थ आम्हाला माहित नसेल असं त्यांना वाटतं असेल तर आम्ही अनाडी आहोत असा त्यांचा गैरसमज आहे, असा टोला शर्मिला ठाकरेंनी भाजपाला लगावला आहे.

सरकारचं आमच्यावर प्रेम आहे आणि अशा प्रेमपत्रांची राज ठाकरेंना सवय: शर्मिला ठाकरे