नवी दिल्ली: भारतात १ सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. नवीन कायद्यातंर्गत वाहतुकीचे नियम मोडल्यास जवळपास ३० पटीने अधिक दंड वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कार, बाईक चालविताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना दंड भरावा लागतो. या नवीन तरतुदीनंतर आता तब्बल १ कोटी ४१ लाख २२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.

वाहतुकीचे नियमभंग होण्याच्या प्रकारांना चाप बसावा या उद्देशाने मोटार वाहन कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ओडिशा राज्यात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यापासून सुमारे ४,०८० चलनांद्वारे ८८ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ४६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. हरियाणामध्ये ३४३ जणांकडून सुमारे ५२ लाख ३२ हजार रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. तर दिल्लीमध्ये नवा कायदा लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी सुमारे ३,९०० जणांवर कारवाई केल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडू नयेत, यासाठी त्यांच्यावर भरमसाठ दंड आकारण्याची तरतूद मोटार वाहन दुरुस्ती विधेयकात (२०१९) करण्यात आली आहे. नवीन तरतुदींनुसार रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनाला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये, धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यास दहा हजार रुपये आणि वेगमर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, विमा नसताना वाहन चालविल्यास दोन हजार रुपये आणि विनाहेल्मेट गाडी चालविल्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द होणार आहे. तसेच, अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, तर गंभीर जखमी झाल्यास अडीच लाख रुपयांची नुकसान भरपाई नव्या तरतुदींनुसार संबंधितांना देण्यात येणार आहेत.

वाहूतक नियमभंग : दोन राज्यातून ४ दिवसांत तब्बल १.४१ कोटींची दंडवसुली