मुंबई: महाराष्ट्रासह अन्य ७ राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर संकट कोसळले होते. आरबीआयने या बँकेतून खातेधारकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती.

बँकिंग नियमन कायदा ’३५ अ’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, किंवा बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असतील असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे सांगण्यात आलं आहे. काल सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले असून, आजही अनेक शाखांमध्ये तीच परिस्थिती आहे.

थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. मात्र, खातेधारकांची अडचण ओळखून आरबीआयने १ हजार रुपयेच काढण्याची मुभा वाढविली असून १० हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे ज्या खातेधारकांनी एक हजार रुपये काढले आहेत त्यांना ६ महिन्यात आणखी ९ हजार रुपये काढता येणार आहेत.

PMC बँक: खातेदारकांना आता सहा महिन्यात १० हजार काढता येणार