मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार १-२ दिवसात सुरु होणार असून सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचा धडाका लागणार आहे. त्यात निवडणुका म्हटलं की भारतीय जनता पक्षासाठी सणच म्हणावा लागेल. अगदी कोल्हापूर-सांगली अतिवृष्टीमुळे पाण्यात बुडालेली असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजानदेश यात्रेत मग्न होते आणि प्रसार माध्यमांनी विषय उचलताच काही दिवसांसाठी यात्रा थांबवली आणि २-३ दिवसात पुन्हा निवडणुकीची यात्रा सुरु केली.
संपूर्ण सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजलेला असताना देखील राज्यातील नेते बचावकार्यासाठी आणलेल्या बोटींमध्ये हसत सेल्फी काढताना राज्यातील जनतेने पहिले. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री हवाई पाहणी करून थेट कर्नाटकातच उतरले, मात्र राज्यात अनेकांचे बळी जाऊन देखील अमित शहा यांचं हेलिकॉप्टर महाराष्ट्राच्या जमिनीवर उतरलेच नाही. तर दुसरीकडे दक्षिणेच्या राज्यांकडे नजर असलेले मोदी केरळ कर्नाटकाच्या बाबतीत जागृत राहिले, मात्र महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांना ९ मिनिटं देखील नव्हता. मात्र त्याच महाराष्ट्रात आता विधानसभा जाहीर होताच राज्यातील सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल ९ सभा घेणार आहेत.
राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकीची संपूर्ण धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या खाद्यांवर घेतल्याचे दिसते. कारण, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाच्या या दोन स्टार प्रचारकांपैकी मोदींच्या ९ तर शाहांच्या १८ सभा राज्यात होणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रासह हरयाणातही विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या राज्यात केवळ ९ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यांपैकी १७ ऑक्टोबर रोजी सातारा आणि पुण्यात मोदींची सभा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी ही सभांचे नियोजन सुरू आहे. पुण्यातील सभेच्या जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
