मुंबई: अखंड महाराष्ट्राला उत्सुकता लागून असलेली राज ठाकरेंची पहिली प्रचार सभा काल पार पडली. खरंतर राज ठाकरेंची ९ तारखेला नियोजित पुण्यातील सभा पावसामुळे रद्द करावी लागली होती. परंतु १० तारखेच्या मुंबईतील नियोजित सभेत त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.
सभेला सुरुवात करत त्यांनी सरकारच्या अनेक गलथान कारभारांवर टीका केली. त्यात PMC बँक, ३७० कलम आणि आरे कॉलोनीतील वृक्षतोड असे बरेच विषय होते. ३७० कलम रद्द केलंत, तुमचं स्वागत आणि अभिनंदन मग पुढे? असा सवाल करत राज ठाकरेंनी सरकारला याच्या पुढे बोला असा इशाराच दिला. सध्या निवडणूक हि महाराष्ट्र विधानसभेची आहे आणि त्याचा कलम ३७० शी काय संबंध? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
पुढे राज ठाकरे म्हणाले ज्या लोकांनी बँकेत पैसे ठेवले ते आज पैशासाठी रडत आहेत आणि ज्यांची लग्न जमालीत त्यांना लग्नासाठी पैसे देखील काढता येत नाहीत अशी वाईट अवस्था या सरकारने करून ठेवली आहे. सरकारने केलेल्या सव्वा लाख विहिरी कधी दिसल्या नाहीत पण जर ते रस्त्यावरील खड्यांना विहिरी समजत असतील तर ठीक आहे, असा खोचक टोला देखील राज यांनी फडणवीस सरकारला लगावला.
आपल्या लग्नाची खरेदी करायला गेलेल्या १ तरुणीचा रस्त्यातील खड्डे चुकविताना ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला, याला जबाबदार कोण? असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे. सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळ चालवला आहे असंच म्हणावं लागेल.
आजवर माझ्या हाती सत्ता द्या असे म्हणणारे राज ठाकरे आता काहीसे वेगळ्या भूमिकेत दिसले. त्यांनी “आता मला सत्ता नाही तर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या” अशी मागणी महाराष्ट्राला केली आहे. सत्तेत असलेला आमदार हा कधीच सरकारला सर्वसामान्य लोकांच्या वतीने जाब विचारू शकत नाही, ते फक्त १ प्रबळ आणि कणखर विरोधी पक्षच करू शकतो आणि म्हणून तुमचे प्रश्न मांडण्यासाठी, तुमच्या वतीने सरकारला जाब विचारण्यासाठी, तुमच्यासाठी वेळप्रसंगी सरकारच्या अंगावर धावून जाण्यासाठी तुम्ही मला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या.
आजवर भारताच्या इतिहासात असा एकही नेता किंवा पक्ष नाही ज्यांनी मला विरोधी पक्ष बनवा अशी मागणी केली असेल. परंतु राज ठाकरे यांनी अशी काहीशी मागणी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. परंतु त्यांच्या या मागणीचे विविध समाज माध्यमांवर स्वागत करण्यात आले.
