मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा रविवारी जळगावमध्ये पार पडली. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. मात्र मोदींच्या या पहिल्याच सभेला अनेकांनी विरोध केल्याचे इंटरनेटवर पहायला मिळाले. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटवर इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता.

महाराष्ट्रात पूर आला असताना मोदी आले नाही आणि आता मते मागायला आले आहेत, तसेच शेतकरी आत्महत्या झाल्यावर पंतप्रधान महाराष्ट्र दौरा करत नाहीत केवळ मते मागायला येतात अशा अशयाचे अनेक ट्विटस हा हॅशटॅग वापरुन करण्यात आले होते. ‘राईट टॅग डॉट कॉम’ या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार या हॅशटॅग वापरुन एक लाखाहून अधिक ट्विटस एका दिवसात करण्यात आले. एकूण चार हजारहून अधिक जणांनाही हा हॅशटॅग आपल्या ट्विटमध्ये वापरल्याचे या वेबसाईटवरील डेटा सांगतो.

‘केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे. तसंच मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीत. कोल्हापुरातील पूरस्थितीतही मोदी कुठे मदत करताना दिसत नाहीत. त्यानंतर आता विधानसभा निवडणुका आल्यानंतर मात्र ते प्रचाराला आले आहेत,’ असा आक्षेप घेत ‘मोदी परत जा’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येऊनही कलम ३७०, चांद्रयान, पाकिस्तान अशा मुद्द्यांवर बोलत आहेत. मात्र शेतकरी, पूर, नोटबंदी, जीएसटी, बरोजगारी, आर्थिक मंदी, अर्थव्यवस्था अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर शब्दही काढत नाहीत, असा नेटकऱ्यांचा आरोप आहे. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग वापरुन जवळपास ३१ हजारहून अधिक ट्वीट आतापर्यंत करण्यात आले आहेत.

राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर भागात आलेल्या पूर परिस्थितीनंतर सरकारच्या भूमिकेवरुनही अनेक युजर्सने रोष व्यक्त केला आहे. पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे होते, असा सवाल युजर्स विचारत आहेत.

#मोदी_परत_जा ट्रेंडिंग धुमाकूळ; एका दिवसात लाखाहून अधिक ट्विट