मुंबईः देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप लावल्यानंतर आज सकाळी शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचं काही मिनिटांत ४५ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. जर कोणाकडे आधीपासूनच विकत घेतलेले शेअर्स असल्यास त्यांनी ते विकू नयेत. तसेच या काळात कोणतीही नवी गुंतवणूक करू नका. रिपोर्टनुसार, इन्फोसिसने नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी अनैतिक पावलं उचलली आहेत. या प्रकरणी एका ग्रुपनं इन्फोसिस बोर्डाला पत्र लिहून माहिती दिली आहे.
गेल्याच आठवड्यात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आली असल्याचा आरोप इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात संबंधित कर्मचाऱ्याने आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैर व्यवहाराचा आरोप केला आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी ही खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने याबाबतच्या पत्रात केला आहे.
इन्फोसिसबाबतीत व्हिसलब्लोअर्सने कंपनीच्या बोर्डाला या प्रकरणात एक पत्र २० सप्टेंबरला लिहिलं होतं. पत्रात लिहिलं होतं की, इन्फोसिस स्वतःचा नफा आणि व्यवसाय वाढवण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब करत आहे. कंपनीचे सध्याचे सीईओ सलील पारेखही यांचाही यात सहभाग आहे. तर दुसरं एक पत्र २७ सप्टेंबरला अमेरिकी शेअर बाजार रेग्युलेटर यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनलाही देण्यात आलं आहे. खरं तर इन्फोसिसचा एडीआर हा न्यूयॉर्क एक्स्चेंजमध्येही आहे. सोमवारी ADR १२ टक्क्यांहून खाली घसरला होता. त्यामुळेच इन्फोसिसचे शेअर्स १५ टक्क्यांनी अधिकनं पडले आहेत.
मागील आठवड्याच्या शुक्रवारी शेअर बाजारात इन्फोसिसचे मूल्य ७६७.७५ रुपये इतके होते. त्यामध्ये आज सकाळी १४ टक्क्यांची घसरण होत शेअर मूल्य ६४५ रुपयांपर्यंत आले. याआधी १२ एप्रिल २०१३ रोजी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहण्यास मिळाली. त्यावेळी २१.३३ टक्क्यांपर्यंत शेअर घसरले होते. मंगळवारी झालेल्या शेअर घसरणीमुळे इन्फोसिसला आज सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची चर्चा आहे. जानेवारी २००० ते आजपर्यंत १६ वेळेस इन्फोसिसचे शेअर दुहेरी अंकानी घसरले आहेत.
