मुंबई: पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोपरखळी मारली आहे. पार्ले कट्टा कार्यक्रमात नितीन गडकरी आले होते. या कार्यक्रमात पाऊस पडू लागला तेव्हा निवेदिकेने त्यांना सांगितलं की नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो आहे पावसाचं काही खरं नाही. त्यावर तातडीने गडकरी उत्तरले की, “पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं पत्रकार म्हणतात” त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. स्वतः नितीन गडकरींनाही हसू आवरलं नाही.

पार्ले कट्टा कार्यक्रमात दिलखुलास गप्पा मारत गडकरींनी विविध प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. अच्छे दिन आले का? असा प्रश्न जेव्हा नितीन गडकरींना विचारण्यात आला तेव्हा गडकरी म्हणाले की, ” अच्छे दिन तर आलेच आहेत, पण अच्छे दिन ही संकल्पना प्रत्येकाच्या मानण्यावर अवलंबून असते. ५०० स्क्वेअर फुटांच्या घरात माणूस म्हणतो की मी सुखी आहे, तर अनेकदा चार फ्लॅट असणारा माणूसही म्हणतो की मी समाधानी नाही. तसंच तुम्ही सरकार म्हणून लोकांच्या जेवढ्या अपेक्षा पूर्ण करता तेवढ्या त्याच्या अपेक्षा वाढत जातात. अच्छे दिन ही संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहे ” दरम्यान ही मुलाखत सुरु असतानाच पाऊस पडू लागला. त्यावेळी हा पाऊस कसा काय पडतो आहे असं निवेदिका म्हणाल्या तेव्हा गडकरी पटकन म्हणाले पावसात भिजलं की भविष्य चांगलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात देशभर पायाभूत सुविधांचा विकास झाला. एकट्या महाराष्ट्रात १ लाख कोटींची विकास कामे सुरू आहेत. रस्ते बनवताना दर्जाही राखला आहे. सिमेंट-काँक्रिटच्या आमच्या रस्त्यांवर दोनशे वर्षे खड्डे पडणार नाहीत, असा दावा गडकरी यांनी केला. त्यांच्या या विधानावर पार्ले कट्ट्याच्या मुलाखतकार यांनी ‘ठेकेदारांचे काय होणार, ते तर रस्त्यावर येतील,’ अशी मल्लीनाथी केली. तेव्हा, अशा ठेकेदारांसाठी मुंबई महापालिका आहे, असा चिमटा गडकरी यांनी काढला.

दरम्यान, नवीन मोटार वाहन कायद्याबाबत गडकरी म्हणाले, हा कायदा महसूल वाढविण्यासाठी नसून रस्ते अपघातांना बळी पडण्यापासून लोकांना वाचविण्यासाठी आहे. भारतात दरवर्षी ५ लाख अपघात होतात. त्यात दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. तर अडीच लाख दिव्यांग होतात. नव्या दुरुस्तीमुळे लोकांच्या मनात कायद्याबद्दल आदर आणि भीती निर्माण होईल. रस्ते अपघात कमी होतील. महसूल गोळा करण्यासाठी नव्हेतर, अपघात रोखण्यासाठी नवा कायदा आहे. कायदा पाळतील त्यांच्यावर दंड भरायची वेळच येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खड्डे’युक्त’ रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांसाठी मुंबई महापालिका आहेच: नितीन गडकरी